महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ऑगस्ट । बैलगाडी शर्यत सुरु व्हावी यासाठी शिरुरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह अनेकांनी लोकसभेत आवाज उठवला आहे. परंतु न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे भरवता येत नाहीत. राज्यात कायदा मोडून जर कोणी स्टंटबाजी करत असेल तर त्यांच्यावर केसेस दाखल होतील, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
सांगली जिल्ह्यात आमदार गोपिचंद पडळकर यांनी नुकत्याच या शर्यती आयोजित केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.पवार म्हणाले, बैल हा पाळीव प्राणी म्हणून गणला गेला पाहिजे. परंतु तो वनप्राणी म्हणून गणला गेला. त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. बैलगाडी शर्यत हा आता केंद्राच्या अखत्यारीतील प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभेत यासंबंधी अनेकदा प्रश्न उपस्थित झाला आहे परंतु आता काहीजण स्पर्धा भरवत स्टंटबाजी करत आहेत.
पाठीमागे पाच वर्षे केंद्रात, राज्यात त्यांचेच सरकार होते. त्यावेळी त्यांना कोणी अडवले नव्हते. आताही केंद्रात त्यांचेच सरकार आहे.शर्यती भरवत महाविकास आघाडी यासंबंधी काही करत नाही, असे दाखविण्याचा काहींचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. परंतु कोणत्याही पक्षाचा व्यक्ती असला आणि तो कायदा मोडत असेल तर नियमाने त्याच्यावर केसेस दाखल होतील.