महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ऑगस्ट । ‘मतदानाच्या आदल्या दिवशी येणारी ‘लक्ष्मी’ लाथाडू नका’, ‘खुशाल गायी कापा, मी तुमच्या पाठीशी आहे’, ‘शेतकऱ्यांना कितीही द्या, रडतातच साले’ अशी एकापेक्षा एक वादग्रस्त विधाने करणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जन आशीर्वाद यात्रेची चक्क ‘शिव्याशाप’ यात्रा केली! काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी म्हणजे सांड आहेत, देवाला सोडलेले पण कोणत्याच कामाचे नसलेले जनावर! अशा भाषेत दानवे यांच्या तोंडून जन आशीर्वाद यात्रेची चक्क ‘शिव्याशाप’ यात्रा केली.
केंद्रातील मोदी सरकारमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या मंत्र्यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. मराठवाड्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आली आहे. बीड, संभाजीनगर असा दरकोस दरमजल मुक्काम करीत ही यात्रा शुक्रवारी जालना येथे पोहोचली. बदनापूर मतदारसंघात यात्रेच्या निमित्ताने सभा घेण्यात आली. या सभेत बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जीभ घसरली.