महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । लीड्समध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या 78 धावांमध्ये कोसळला होता. या लढतीत भारताला एक डाव आणि 76 धावांनी पराभव सहन करावा लागला. लीड्स कसोटीनंतर भारतीय संघात बदलाचे वारे वाहू लागले आहे. चौथ्या कसोटीमध्ये विजय मिळवून मालिकेतील पराभव टाळण्यासाठी कर्णधार कोहली चार बदल करण्याची शक्यता आहे.
1. इशांत शर्माची गच्छंती
वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याची कामगिरी लीड्स कसोटीमध्ये खूपच साधारण राहिली होती. तिसऱ्या कसोटीत इशांतने 22 षटकात 92 धावा दिल्या आणि त्याला एकही बळी घेता आला नाही. त्यामुळे त्याच्या जागी शार्दुल ठाकूरचा संघात समावेश होऊ शकतो. नॉटिंगहॅम कसोटीत शार्दुल खेळला होता, मात्र त्याला दुखापत झाल्याने लॉर्डस आणि लीड्स कसोटीत इशांत शर्माला खेळवण्यात आले होते.
2. अश्विनचे कमबॅक पक्के
आयसीसीच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आर. अश्विन याने शानदार गोलंदाजी केली होती. तसेत कसोटी क्रमवारीमध्ये अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. तरीही त्याला पहिल्या तीन कसोटीमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याच्या जागी रविंद्र जाडेजा याचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र फलंदाजी आणि गोलंदाजीतही जाडेजाची कामगिरी खास झालेली नाही, त्यामुळे ओव्हल कसोटीमध्ये अश्विनचे संघात कमबॅक होणार हे पक्के मानले जात आहे.
3. सूर्यकुमारला संधी मिळण्याची शक्यता
श्रीलंका दौऱ्याहून थेट इंग्लंडला पोहोचलेला फलंदाज सूर्यकुमार यादव याला संघात स्थान मिळवण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार सध्या तुफान फॉर्मात आहे, याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न विराट कोहलीचा असेल. मात्र सूर्यकुमारला खेळवण्यासाठी विराटला मोठा निर्णय घ्यावा लागेल आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे किंवा चेतेश्वर पुजारा यापैकी एकाला संघातून बाहेरचा रस्ता दाखवाला लागेल.
4. पंतवर टांगती तलवार
यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्यावरही टांगती तलवार आहे. फलंदाजीत आणि विकेटच्या मागेही त्याची कामगिरी सामान्य राहिली आहे. पंतला बाहेरचा रस्ता दाखवून के.एल. राहुलकडे यष्टीरक्षकाची जबाबदारी दिली जावू शकते. पंतच्या जागी हनुमा विहारीला संघात स्थान देऊन फलंदाजी आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न विराट कोहलीचा असेल