…तर आम्ही मुख्यमंत्र्यांचं स्वागत करू; नारायण राणेंचा यू टर्न

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० सप्टेंबर । कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगत आहेत. या विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांनी आलंच पाहिजे असं काही नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane News) यांनी केल्याने वाद निर्माण झाला होता. आता मात्र नारायण राणे यांचा सूर बदलेला दिसत आहेत.

चिपी विमानळावरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला येण्याची शक्यता आहे, याबाबत तुमची भूमिका काय राहील, असा प्रश्न नारायण राणे यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना राणे यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री या उद्घाटन सोहळ्यात आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्वच कार्यक्रमांना आलंच पाहिजे असं काही नाही, असं म्हणणारे नारायण राणे यांनी आता मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची भूमिका घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भाजपच्या इतर नेत्यांनी मांडलेल्या भूमिकेमुळेच राणेंनी आपला सूर बदलला का, अशीही चर्चा सुरू आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी या उद्घाटनाला यायला हवं, असं भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हेदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतात की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *