महाराष्ट्र २४- :मुंबई: ‘आमचं सरकार येऊन दोनच महिने झाले आहेत. आम्हाला थोडी उसंत मिळायला हवी. पण काही लोकांना फारच घाई झालेली आहे, असं सांगत, ‘महाविकास आघाडी सरकार राज्यातील जनतेचं हित डोळ्यांपुढं ठेवून काम करतंय. पुढील काही दिवसांत असं काम करू की भाजपला भविष्यात आंदोलनं करावी लागणार नाहीत,’ असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज हाणला.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आजच्या कामकाजासाठी विधान भवनात जाण्यापूर्वी अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकरी कर्जमाफीसाठी भाजपनं काल केलेल्या आंदोलनाचा त्यांनी खास शैलीत समाचार घेतला. ‘विरोधी पक्षात असताना आंदोलन करावं लागतं. लोकशाहीत तो अधिकार प्रत्येकाला आहे. आम्हीही तो मानतो. आम्हीही विरोधी पक्षात असताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसायचो. आंदोलनं करायचो. घोषणाबाजी करायचो. काल भाजपच्या लोकांना पाहून आम्हाला मागचे दिवस आठवले,’ असं अजित पवार म्हणाले. ‘कर्जमाफी योजनेचा शुभारंभ झालाय. कर्जमाफीची प्रक्रिया दोन-तीन महिन्यांत पूर्ण होईल,’ असंही त्यांनी सांगितलं.