Weather Forecast: पुढील 5 दिवस राज्यात कोरड्या हवामानची शक्यता ; या 2 जिल्ह्यात कोसळणार सरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ सप्टेंबर । कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणांना पावसानं अक्षरश: झोडपून काढलं आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसानं दाखवलेल्या रौद्ररुपामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. यानंतर आता राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यात सर्वत्र कोरड्या हवामानची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज राज्यात केवळ दोन जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पालघर आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांना हवामान खात्यानं आज येलो अलर्ट दिला आहे. पुढील चोवीस तासांत या दोन जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान याठिकाणी मेघगर्जनेसह वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पालघर आणि नंदुबार हे दोन जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि घाट परिसरात काही ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी नभ भरून आले आहेत. पण याठिकाणी आज पावसाची शक्यता जवळपास नाहीच. राज्यात हीच स्थिती पुढील पाच दिवस कायम राहणार आहे.

बंगालच्या उपसागरात आणि गुजरातमध्ये निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्रामुळे उत्तर कोकण आणि पालघर जिल्ह्यात सरासरी 140 मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. तर डहाणू 135, पालघर 123, वाडा 118, जव्हार येथे 107 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे आणि रत्नागिरीतही जोरदार पाऊस पडला आहे. दरम्यान नाशिक आणि पुण्यासह घाटमाथ्यावर जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तर महाबळेश्‍वर येथे 132 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *