IPL 2021 ; पुणेकर ‘राहुल त्रिपाठी ’ ठरला शाहरुखच्या टीमचा ‘हिरो’, SIX लगावत काढलं फायनलचं तिकीट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑक्टोबर । आयपीएल स्पर्धेच्या क्वालिफायर 2 मध्ये (IPL 2021 Qualifier 2) बुधवारी झालेली मॅच शेवटपर्यंत रंगली. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Kolkata Knight Riders vs Delhi Capitals) यांच्यात झालेल्या या मॅचमध्ये केकेआरनं 3 विकेट्स आणि 1 बॉल राखून निसटता विजय मिळवला. पुणेकर राहुल त्रिपाठीनं (Rahul Tripathi) शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स लगावत केकेआरला आयपीएल इतिहासात तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचवलं.

दिल्ली कॅपिटल्सनं दिलेल्या 136 रनचा पाठलाग करण्यासाठी केकेआरनं भक्कम सुरुवात केली होती. शुभमन गिल (Shubman Gill) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांनी दमदार सलामी दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 96 रनची पार्टनरशिप केली. या सिझनमध्ये फॉर्मात असलेल्या अय्यरनं तिसरं आयपीएल अर्धशतक झळकावलं. त्यानंतर लगेच तो 55 रन काढून आऊट झाला. अय्यर आऊट झाल्यानंतरही केकेआरचं पारडं जड होतं. 16 व्या ओव्हरमध्ये केकेआरची 1 आऊट 123 अशी भक्कम स्थिती होती.

नॉर्खियानं नितिश राणाला (Nitish Rana) आऊट करताच ही परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. आवेश खाननं पुढच्याच ओव्हरमध्ये शुभमन गिलचा (46) अडथळा दूर केला. गिल आऊट होताच केकेआरचे खेळाडू मैदानात फक्त हजेरी लावून परतत होते. दिनेश कार्तिक आणि इयन मॉर्गन हे शून्यावर आऊट झाले.

केकेआरला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 7 रनची गरज होती. दिल्लीकडून अनुभवी आर. अश्विन (R. Ashwin) शेवटची ओव्हर टाकण्यासाठी आला. अश्विनच्या पहिल्या बॉलवर त्रिपाठीनं एक रन काढला. दुसऱ्या बॉलवर शाकिब अल हसनला एकही रन काढता आला नाही. त्यानंतर पुढच्याच बॉलवर तो शून्यावर LBW झाला. त्यानंतर आलेला सूनील नरीन मोठा फटका मारण्याच्या नादात अक्षर पटेलकडं कॅच देऊन आऊट झाला.

नरीन आऊट झाल्यानंतर केकेआरला जिंकण्यासाठी 2 बॉलमध्ये 6 रनची गरज होती. केकेआरची ही सारी पडझड एका बाजूनं पाहत असलेला राहुल त्रिपाठी स्ट्राईकवर आला. त्यानं हॅट्ट्रिकवर असलेल्या अश्निला सिक्स लगावत केकेआरच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयानं केकेआरनं तब्बल 7 वर्षानंतर आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

त्रिपाठीची सातत्यपूर्ण कामगिरी

राहुल त्रिपाठीनं मागच्या सिझनमध्येही चमकदार खेळ केला होता. या सिझनमध्ये त्यानं खेळ आणखी उंचावला आहे. त्यानं या आयपीएल सिझनमध्ये 141.07 च्या स्ट्राईक रेटनं 395 रन काढले आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. केकेआरला आता फायनलमध्येही राहुल त्रिपाठीकडून अशाच चमकदार खेळाची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *