महाराष्ट्र 24 -नवी दिल्ली,
भारतात (India) कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या 29 झाली आहे. भारतातही कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यामुळे खबरदारी म्हणून दिल्लीतील शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्यात. दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे.
दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा बंद करण्याचे निर्देश दिल्ली सरकारने दिलेत, अशी माहिती शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. “देशात कोरोनाव्हायरसचा धोका पाहता, व्हायरस जास्त पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून दिल्लीतील प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिल्ली सरकारने दिलेत. यामध्ये सरकारी, खासगी अशा सर्व शाळांचा समावेश आहे”, असं सिसोदिया यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दिल्लीमधील एका कोरोनाबाधित रुग्णामुळे आग्र्यातील (Agra) 6 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर जयपूर (Jaipur) येथे पर्यटनासाठी आलेल्या इटालियन (Italian) ग्रुपमधील 16 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या भारतीय ड्रायव्हरलाही या आजाराची लागण झाली आहे. हैद्राबादमध्ये (Hyderabad) एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या केरळात (Kerala) 3 बाधित रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.