महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ नोव्हेबर । राज्य परिवहन महामंडळाते राज्य सरकारमध्ये विलगिकरण व्हावे या मागणीसाठी जिल्ह्यातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. परतूर आणि अंबड आगारातील कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री पासून १०० टक्के काम बंद आंदोलन सुरु केल्याने या दोन्ही आगारातून आज (रविवार) सकाळपासून एक ही बस बाहेर पडली नाही. सणा सुदीच्या दिवसात एसटीची चाके थांबल्याने प्रवाशांचा खाेळंबा झाला आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात देखील मध्यरात्रीपासून एसटी कर्मचा-यांनी काम बंद आंदाेलन सुरु केल्याने प्रवासी संतापले आहेत. MSRTC Buldhana
एसटी महामंडळाच्या वाहक, चालक आणि यांत्रिकी कर्मचांऱ्यानी बैठक बोलवत विना नेता विना संघटना या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यक्ष आणि सचिवांनी संघटनांच्या पदाचा राजीनामा देत हा संप पुकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील परतूर आणि अंबड आगारातून आज (रविवार) सकाळपासून एक ही बस बाहेर न पडल्याने भाऊबीज या सणा निमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली. जो पर्यंत शासन निर्णय घेत नाही तो पर्यंत संप सुरच ठेवण्याचा निर्णय कर्मचांऱ्यानी घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एसटीची चाके थांबली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात लालपरीची चाके थांबले
राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलगिकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता देणे, घरभाडे भत्ता देणे यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने जिल्ह्यातील काल मध्यरात्री पासून सात आगारातील एसटी पूर्णतः थांबली आहे. मध्यरात्रीपासून एकही एसटी डेपो बाहेर पडली नाही. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात ऐन दिवाळीच्या सणात लालपरीची चाके थांबल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे.