महाराष्ट्र 24 – मुंबई
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने १०० दिवस पूर्ण केले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुक्काम मातोश्रीवरच आहे. उद्धव ठाकरे काही दिवसांनी मातोश्रीवरून वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी मुक्काम हलवतील अशी शक्यता होती. आता मात्र आपण मातोश्रीवरच राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
मलबार हिल येथील हा वर्षा बंगला मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान. या बंगल्यावर राहण्याचं अनेक राजकारण्यांचं स्वप्न असतं. उद्धव ठाकरे यांना तर ही संधी चालून आली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्री बंगला सोडवेना. सुरुवातीचे काही दिवस उद्धव ठाकरे मातोश्रीवर राहून नंतर वर्षावर जातील अशी चर्चा होती. मात्र आता उद्धव ठाकरे वर्षावर जाणार नसल्याचं त्यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे. संपूर्ण राज्याचा गाडा हाकणार्या मुख्यमंत्र्यांचं काम सकाळी लवकर सुरू होतं. त्यामुळेच वर्षावर निवासस्थान आणि मुख्यमंत्री कार्यालय अशी दुहेरी व्यवस्था आहे. पोलीस अधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी राज्याच्या स्थितीची माहिती सकाळीच मुख्यमंत्र्यांना देत असतात, शहरात राहणार्या या अधिकार्यांना यासाठी सकाळी मातोश्रीवर जावं लागतं, त्यात त्यांचा वेळ जातो.