महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ नोव्हेबर । बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. कंगनाने कृषी कायदे रद्द केल्यानंतर आणखी एक पोस्ट केली आहे. यात तिने इंदिरा गांधी यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांना आपल्या चपलीखाली डासांप्रमाणे चिरडल्याचं वक्तव्य केलं आहे. यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. यानंतर आता शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी कंगनावर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. “या अभिनेत्रीला तुरुंगात टाका किंवा वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांनी कंगनाच्या या पोस्टवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “या अभिनेत्रीला एकतर तुरुंगात टाकावे किंवा तिला वेड्यांच्या रुग्णालयात पाठवावे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिची मानसिक स्थिती कशी आहे हे स्पष्टपणे दिसते,” असे ते म्हणाले.
कंगनाच्या विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार इन्स्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आली आहे. या समितीने दिलेल्या माहितीनुसार, कंगनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार ही मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील सायबर सेलमध्ये करण्यात आली आहे. या शीख समुदायाच्या मते, कंगनाने जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन असल्याचे वर्णन केले आहे. तसेच तिने शीख समुदायविरोधात वक्तव्य करतेवेळी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला आहे, असे शीख समुदायाचे म्हणणं आहे.