Weather Alert : मुंबई, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ नोव्हेबर । राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांचं आधीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात पुन्हा एकदा हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नोव्हेंबर महिना संपत आला तरी देखील राज्यात अद्यापही बऱ्याच ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. काही ठिकाणी थंडीची चाहुल लागली तरीदेखील ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मोठं संकट ओढवलं आहे.

आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबरपासून पुढच्या तीन दिवसात राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी परिसरामध्ये हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे.

यामुळे मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, उस्मानाबाद, औरंगाबाद, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यासह अनेक घाट परिसरामध्ये हवामान सध्या ढगाळ असून ३० नोव्हेंबरला मुंबईसह या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

रायगड, पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि आपल्या शेतमालाला सुरक्षित ठिकाणी ठेवावे असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *