राज्यातील कमाल तापमान सरासरीखाली ; उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे दिवसा हवेत गारवा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ जानेवारी । उत्तरेकडील राज्यांत थंडीची लाट असल्याने रात्रीच्या किमान तापमानापेक्षा दिवसाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन दिवसांपासून मोठी घट झाल्याने दिवसा गारवा जाणवतो आहे. थंडीची लाट आणखी एक दिवस कायम राहणार आहे. त्यानंतर राज्यातील तापमानातही काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडील पंजाब, हरियाणा, राजस्थानपासून मध्य प्रदेशपर्यंत दोन दिवसांपासून थंडीची लाट आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. त्यामुळे रात्रीच्या किमान तापमानात काही प्रमाणात वाढ होऊन ते सरासरीपुढे गेले आहे. मात्र, दिवसाच्या कमाल तापमानात मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. परिणामी दिवसा काही प्रमाणात गारवा जाणवतो आहे.

मुंबई आणि कोकण विभागातील कमाल तापमान सरासरीच्या जवळ आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सर्वच ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांखाली आले आहे. मध्य महाराष्ट्रात ते २२ ते २८ अंश सेल्सिअसवर असून, सरासरीच्या तुलनेत १ ते ४ अंशांनी कमी आहे. मराठवाडय़ात २४ ते २७ अंशांदरम्यान कमाल तापमान असून, सरासरीपेक्षा ते २ ते ४ अंशांनी कमी आहे. विदर्भात २५ ते २६ अंशांदरम्यान कमाल तापमान असून, या भागातही ते सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांनी कमी आहे.

रात्रीच्या कमाल तापमानात सर्व ठिकाणी वाढ होत आहे. राज्यात बहुतांश भागातील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांनी अधिक आहे. उत्तरेकडील थंडीची लाट आणखी एक दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *