महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० जानेवारी । राज्यात कडक निर्बंध लागू होत असतानाच धार्मिक स्थळे तसेच दारूच्या दुकानांवर होणारी गर्दी पाहून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला सावधगिरीचा इशारा दिला आहे. नव्या नियमांत धार्मिक स्थळे, दारूच्या दुकानांचा उल्लेख नसला तरी जर गर्दी होत असेल तर ती बंद करावी लागतील. अशा ठिकाणी एकाच वेळी जास्त गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंगचे कटाक्षाने पालन करा, असे राजेश टोपे म्हणाले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, सध्या राज्यात रोज 40 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ज्या ठिकाणी गर्दी होईल तेथे निर्बंध लावले जातील. महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे, मात्र काळजी करण्याचे कारण नाही. संसर्ग रोखण्यासाठी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. रुग्ण हॉस्पिटलकडे येण्याचे प्रमाण सध्या कमी आहे. मात्र ऑक्सिजनची मागणी वाढली आणि खाटा कमी पडल्या की निर्बंध वाढवले जातील.