महाराष्ट्र २४ ऑनलाईन ;मुंबई – मुंबई : राज्यात कोरोना विषाणुंच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील उपस्थिती आता फक्त 25 टक्क्यांवर आणण्यात आली आहे, तसंच मेडिकल, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (20 मार्च) जाहीर केलं. रेल्वे, बस बंद केल्या तर अत्यावश्यक सेवा खोळंबतील. त्यामुळे तूर्तास रेल्वे आणि बस सेवा बंद होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
जीवनावश्यक क्षेत्रासाठी काम करत असलेली खाजगी कार्यालये वगळून अन्य सर्व कार्यालयेही बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. खाजगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचं या काळातील सुट्टीचं वेतन कापू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. फेसबुक लाईव्हवरुन राज्याला उद्देशून संवाद साधला, त्यात त्यांनी ही घोषणा केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर आणि यूट्यूब या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केलं. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला होणारी पत्रकार आणि अन्य माध्यमकर्मींची गर्दी टाळण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांसोबत आजच्या संबोधनात राज्यातील प्रशासनाचे प्रमुख मुख्य सचिव अजॉय मेहता आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे ही होते.