महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ जानेवारी । विराट कोहलीनं (Virat Kohli) दोन दिवसांपूर्वी टेस्ट टीमच्या कॅप्टनपदाचा राजीनामा दिला आहे. आता विराटच्या जागी नवा कॅप्टन कोण होणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. टेस्ट टीमच्या कॅप्टन पदासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) ही नावं चर्चेत आहेत. त्याचवेळी बीसीसीआयने नव्या कॅप्टनचे नाव निश्चित केले आहे.
भारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून रोहित शर्माचं (Rohit Sharma) नाव निश्चित करण्यात आलं आहे. रोहित सध्या वन-डे आणि टी20 टीमचा पूर्णवेळ कॅप्टन आहे. दुखापतीमुळे त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाता आलेलं नाही. त्यामुळे केएल राहुल (KL Rahul) आगामी वन-डे मालिकेत कॅप्टनसी करणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील वन-डे मालिका 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्धची वन-डे मालिका संपल्यानंतर बीसीसीआय रोहितच्या नावाची औपचारिक घोषणा करेल, असे वृत्त ‘इनसाईड स्पोर्ट्स’ ने बीसीसीआय अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘रोहित शर्मा टेस्ट टीमचा कॅप्टन होणार यामध्ये कोणतीही शंका नाही. रोहितला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन करण्यात आले होते. आता विराटने राजीनामा दिल्यानंतर त्याची कॅप्टनपदी नियुक्ती होईल. याबाबत लवकरच औपचारिक घोषणा करण्यात येईल.
बीसीसीआच्या अधिकाऱ्यानं रोहित शर्माला कॅप्टन होण्यासाठी एका अटीचे पालन करावे लागेल असंही स्पष्ट केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ निवड समितीचे अधिकारी रोहितशी फिटनेस आणि वर्क लोडबाबत चर्चा करतील. रोहित सध्या वन-डे आणि टी20 टीमचा कॅप्टन आहे. टेस्ट टीमचा कॅप्टन झाल्यानंतर त्याचा वर्क लोड आणखी वाढणार आहे. आगामी काळात त्याला सर्व प्रकारातील क्रिकेटसाठी स्वत:ला फिट ठेवावे लागेल. रोहितसाठी फिटनेस ही एक समस्या आहे. निवड समितीचे अधिकारी त्याच्याशी याबाबत चर्चा करतील.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात श्रीलंकेविरुद्ध मालिका होणार आहे. या मालिकेपूर्वी रोहितची कॅप्टन म्हणून घोषणा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.