महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ जानेवारी । महाराष्ट्रात डाळींब मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पूर्वी भारतात अफगाणिस्तानातून डाळींब येत असत. पण आता महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यात विशेषत: महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या सोलापूर, नगर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात डाळिंबाची लागवड मोठया प्रमाणावर केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात डाळींब हे फळ मुबलक प्रमाणात सहजपणे उपलब्ध होऊ शकते. ते आरोग्यासाठी फार उपयुक्त फळ मानले जाते. कारण त्याच्यामध्ये कर्करोग प्रतिबंधक द्रव्ये असून ते फायटो केमिकल्स्ने युक्त असते.
अधूनमधून डाळींब खाण्याचे फायदे म्हणजे हृदय मजबूत होते. त्यातील पॉलिथेनॉल्स् आणि टॅमिन या बाबतीत उपयुक्त ठरतात. या दोन द्रव्यांमुळे रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहतो. कर्करोगाच्या बाबतीत सुद्धा डाळींब गुणकारी आहे. शरीरामध्ये कर्करोगांच्या पेशींची होणारी वाढ डाळिंबामुळे रोखली जाते. काही कर्करोगांच्या पेशी डाळिंबामुळे मरतात सुद्धा असा काही लोकांचा दावा आहे. अर्थात तो अजून सिद्ध झालेला नाही.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा डाळिंबाचा उपयोग होतो, कारण डाळिंबात भरपूर फायबर्स आणि व्हिटॅमिन्स असतात. डाळिंबाच्या नित्य सेवनाने त्वचा तुकतुकीत होते आणि निरोगी राहते, शिवाय त्वचेवरच्या सुरकुत्या त्यामुळे कमी होतात. डाळिंबाच्या सेवनाने दातांच्या किडीला सुद्धा प्रतिबंध केला जातो. डाळिंबाचा रस पिल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात.