महाराष्ट्र २४- ऑनलाईन ; मुंबई ; महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आज पुन्हा वाढली आहे. आता महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण ८९ रुग्ण झाले आहेत. तर देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४१५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात कोरोनाचे नवे १५ रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये मुंबईत १४ तर पुण्यात एक रुग्ण आढळला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील जनतेच्या चिंता वाढल्या आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाने आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. या तिसऱ्या मृत्यूची नोंद मुंबईतच झाली आहे. कोरोनाग्रस्त ६८ वर्षीय फिलिपिन्स नागरिकाचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
कोरोनाचं संकट हे महाराष्ट्रावर अधिक आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर लोकांनी सहकार्य करण्याची अधिक गरज आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत लोकांना विनंती केली होती की, ‘गरज असेल तरच बाहेर पडा.’