घाबरून जाऊ नका ; सरकार खंबीर आहे ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन ; मुंबई ; राज्यातील जनता धैर्य, चिकाटी, जिद्दीने कोरोनाच्या संकटाला सामोरी जात आहे. मात्र कोरोनाच्या रुग्णांची वाढत जाणारी संख्या पाहता आता अधिक खंबीर पावले उचलण्याची वेळ आली आहे. जनता कर्फ्युला ज्याप्रमाणे उत्स्फुर्त प्रतिसाद दिला त्याप्रमाणेच पुढचे काही दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे राज्यातील संपूर्ण नागरी भागात नाईलाजाने 144 कलम लावण्यात येत आहे. राज्यभरातील सर्व सरकारी तसेच खासगी वाहतूक बंद करण्यात येत आहे. ज्या बस सुरू राहतील त्यातून केवळ अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांनाच ने-आण करण्यात येईल. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद राहतील. शासकीय कार्यालयांत केवळ पाच टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील़ हे संकट गंभीर असले तरी सरकार खंबीर आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, आवश्यक ती काळजी घेण्यासाठीच हे पाऊल उचलले आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी 3 वाजता फेसबुक लाइव्ह, यू ट्यूब तसेच टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

माणुसकी जपा, कर्मचाऱ्यांचे किमान वेतन बंद करू नका!
आपण मंदिरे, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे बंद केली. कारण हा विषाणू कोणत्याही प्रकारे जातपात, धर्म पाहत नाही. कोणताही देश या संकटातून सुटला नाही. म्हणूनच आपण अनेक खासगी कार्यालये, आस्थापना यांना कामगार, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची संख्या कमी करायला सांगितली. वर्क फ्रॉम होम असे सांगितले, पण हाच कर्मचारी आणि कामगारवर्ग आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांना जपा, माणुसकी सोडू नका आणि त्यांचे किमान वेतन बंद करू नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *