महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ फेब्रुवारी । उत्तर भारतात आलेल्या पश्चिमी चक्रवातामुळे जम्मू-काश्मीर, कुलू, मनाली, सिमला या भागात हिमवृष्टी होत आहे. तसेच दोन दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद पुन्हा निफाडमध्ये करण्यात आली. शनिवारी (५ फेब्रुवारी)येथे पारा ५.५ घसरला होता तर औरंगाबादेत ९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
राज्यात शुक्रवारी सायंकाळपासूनच वातावरणात गारठा वाढला होता. शनिवारी सकाळी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतेक भागात किमान तापमानात घसरण झाल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रात तापमानात मोठी घसरण झाल्याने नागरिकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका अधिक असून शनिवारी जळगाव येथे ६.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भातील गोंदिया, नागपूर, वर्धा या ठिकाणीही किमान तापमान ९ अंशांच्या दरम्यान असल्याने कडाक्याची थंडी जाणवत होती.
फेब्रुवारी मध्यापर्यंत गारठा अफगाणिस्तानमधून २९ जानेवारी, २ फेब्रुवारी रोजी पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतात बर्फवृष्टी तर महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. ६ फेब्रुवारी रोजी पुन्हा उत्तर भारतात पश्चिमी चक्रवाताचा अंदाज असल्याने फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रात गारठा राहण्याची शक्यता आहे. – माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ प्रमुख शहरांतील किमान तापमान जळगाव६.५ नाशिक८.८ औरंगाबाद९.० अहमदनगर९.० गोंदिया९.२ नागपूर९.२ वर्धा९.४ वाशिम१०.० पुणे१०.३ अकोला१०.६ अमरावती११.५ परभणी११.५ बुलडाणा११.६ महाबळेश्वर११.७ नांदेड१२.० सोलापूर१२.३