महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १० फेब्रुवारी । दक्षिण आफ्रिका विरूद्धची टेस्ट सीरिज गमावल्यानंतर विराट कोहलीनं (Virat Kohli) कॅप्टनपदाचा राजीनामा दिला. विराटच्या जागेवर रोहित शर्माची (Rohit Sharma) नियुक्ती निश्चित मानली जात आहे. भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील टेस्ट सीरिजपूर्वी ही नियुक्ती होईल. टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये रोहित शर्माची राजवट सुरू होण्याचे संकेत मिळतात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अजिंक्य रहाणेसह (Ajinkya Rahane) चार खेळाडूंची टीममध्ये जागा मिळणे आता अवघड आहे. या सर्वांची कामगिरी समाधानकारक नाही. त्यामुळे निवड समितीनं हेड कोच राहुल द्रविडशी (Rahul Dravid) चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.
‘इनसाईड स्पोर्ट्स’ नं दिलेल्या वृत्तानुसार अजिंक्य रहाणेसह चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), फास्ट बॉलर इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि विकेटकिपर ऋद्धीमान सहा यांना टीममध्ये जागा मिळणार नाही. ‘निवड समिती नव्या खेळाडूंना संधी देणार आहे. त्यामुळे या सिनिअर खेळाडूंना वैयक्तिकपणे तसं कळवण्यात आले आहे. कोच राहुल द्रविड आणि टीम मॅनेजमेंटमधील वरिष्ठ सदस्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे,’ अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिली.
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचा गेल्या दोन वर्षांपासून फॉर्म खराब आहे. त्यामुळे त्यांना टीममध्ये जागा मिळवण्यासाठी रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार अजिंक्य मुंबईकडून तर पुजारा सौराष्ट्राच्या टीमकडून रणजी स्पर्धेत खेळणार आहे.
इशांत शर्मा आणि ऋद्धीमान साहा यांच्या कारकिर्दीमधील सर्वोत्तम काळ संपला असल्याचं मत निवड समितीचं आहे. या दोघांनाही पर्याय आता उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय कारकिर्द देखील आता संपण्याच्या मार्गावर आहे.