महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २१ फेब्रुवारी । रोहित शर्माला नुकतेच तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. विराट कोहोलीनंतर आता अनेक वर्षांनी टीम इंडियाचं कर्णधारपद रोहितला मिळालं आहे. सहाजिकच आहे की कर्णधार बदलल्यामुळे खेळात आणि टीममध्ये अनेक बदल होणार. तसेच यामुळे खेळाची पद्धत देखील बदलणार. तसेच काहीसे रोहित शर्माच्या येण्याने झाले. यामुळे अशा एका खेळाडूला संधी मिळाली आहे, जो यापूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीमसाठी फारसा खेळू शकलेला नाही.
हा खेळाडू दुसरा कोणी नसून संघाचा जादुई फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आहे. कुलदीप यादवचे खूप मोठ्या कालावधीनंतर कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. बराच काळ टीम इंडियातून बाहेर असलेला कुलदीप आता पुन्हा एकदा तिन्ही फॉरमॅटमध्ये परतला आहे.
2017 ते 2019 या काळात कुलदीपला संघाची ताकद मानली जात होती, पण त्यानंतर चांगला रेकॉर्ड असूनही या गोलंदाजाकडे दुर्लक्ष केले जात होते आणि त्याला संघात खेळण्याची फारच कमी संधी मिळाली.
श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेसाठी कुलदीप यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे. कुलदीपने 13 फेब्रुवारी 2021 रोजी भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला.
कुलदीपने आतापर्यंत 7 कसोटी सामन्यात 23 च्या सरासरीने 26 बळी घेतले आहेत. पण आता त्याचे संघात पुनरागमन झाले आहे आणि हा खेळाडू पुन्हा प्लेइंग 11 मध्ये परतला आहे, ज्याचा फायदा टीम इंडियाला देखील होईल हे नक्की