एसटीचे वेळापत्रक कोलमडलेलेच; संपाने प्रवाशांचे हाल; खासगी बस परवडत नसल्याने गैरसोय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २२ फेब्रुवारी । शंभर दिवस उलटूनही एसटी संप पूर्णत: मिटण्याची चिन्हे दृष्टिक्षेपात नसून प्रवाशांच्या हालअपेष्टांबाबत सरकार, विरोधी पक्षांसह इतर राजकीय पक्ष, कामगार संघटना आणि धोरणकर्ते सर्वांनाच काहीही वाटेनासे झाले आहे. सध्याच्या संपूर्ण व्यवस्थेत एसटीच्या प्रवाशांचा विचार कधी आणि केव्हा होणार, असा उद्विग्न सवाल आता उपस्थित केला जात आहे. अनेकांना नाईलाजाने खासगी बसचा महागडा पर्याय निवडावा लागत असून, अशाने एसटीपासून प्रवासी कायमचा दुरावण्याची चिन्हे आहेत.

‘शिवनेरी बससेवा परवडत नसल्याने साध्या बसची दुपारपासून वाट पाहत आहे. दोन तास झाले तरी बस आली नाही. इथे नियंत्रण कक्षावर शिवनेरीने जाण्याचा सल्ला दिला गेला. शिवनेरी खिशाला परवडत नाही. आता बस आली तरी घरी पोहोचण्यास रात्री उशीर होणार” अशी व्यथा कमलाकर डोईफोडे यांनी मांडली.’महिला सोबत असल्याने रात्र होण्याच्या आत पोहोचू म्हणून वेळेवर आलो. मात्र सात वाजले, तरी बसचा पत्ता नाही,’ असे सौरभने सांगितले.

मुंबईला जाणाऱ्या साध्या एसटी सुटण्यासाठी असलेल्या फलाटावर अनेक प्रवासी तासन्‌तास वाट पाहत असलेले दिसतात. सोलापूर, कोल्हापूर, सातारा, वाई, मुंबईसह अनेक ठिकाणी जाणाऱ्या शेकडो प्रवाशांना दररोज बसच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा सामना करावा लागत आहे. साधी बससेवा अजूनही रुळावर येण्याची चिन्हे नसल्याने गरीब प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे. शिवशाही आणि शिवनेरी सेवा सर्वसामान्यांना परवडणारी नसून त्याऐवजी साध्या बसेसही अधिक संख्येने सोडण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

मुंबई, कोल्हापूर, ठाण्याला जाण्यासाठी शिवनेरी, शिवशाही बससेवा समाधानकारक संख्येने सुरू आहेत. अनेक बस पूर्ण क्षमतेने भरूनही जात नाहीत. या बससेवेचे तिकीट अनेक प्रवाशांना परवडणारे नसल्याने सध्या बससेवेला मोठी मागणी असल्याचे चित्र स्वारगेट स्थानकात पाहायला मिळते. एसटीचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याने सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी पुरेश्या संख्येने सुरू करण्यासाठी एसटी प्रशासनाने तातडीने प्रयत्न करण्याची मागणी अनेक प्रवासी करत आहेत.

खाजगी, कर्नाटक एसटी सुसाट

एसटी संपामुळे वेळापत्रक कोलमडलेल्या एसटीला पर्याय म्हणून अनेक जण खाजगी व कर्नाटक राज्य परिवहनच्या बसने जाण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे या गाड्यांना मोठी मागणी आहे. विशेषतः मुंबईला जाणाऱ्या खासगी बस ३५० रुपयांत वातानुकूलित सेवा उपलब्ध करून देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *