महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २२ फेब्रुवारी । देशातील उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी त्यांना तत्काळ भांडवल उपलब्ध व्हावे म्हणून देशातील बँकांनी ग्राहकाभिमुख बनावे, असे आवाहन सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. बँका ग्राहकाभिमुख बनल्यास नव्याने उद्योग सुरू करणाऱ्या स्टार्टअपची जादा व्याज दराच्या कर्जातून सुटका होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन प्रथमच मुंबईच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या असून त्यांची सोमवारी उद्योजक आणि बँकिंग प्रतिनिधींसोबत बैठक झाली. यावेळी त्यांनी बँकिंग व्यवसायात आणखी सुसूत्रता आणणे आवश्यक असल्याचे सांगितले.