महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३ मार्च । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटिशीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी वक्तव्य केलं आहे. नोटीशी देण्याची पद्धत राज्यात नव्हती. पण जबाबदार व्यक्तीनेही बोलताना भान बाळगलं पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी सकाळपासून पुण्यातील (pune) विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्याचे काम सुरू केले आहे. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना नोटीस आली आहे. त्याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं होतं, त्यावर त्यांनी हा सल्ला दिला. तसेच जनतेला राजकारण्यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजिबात रस नाही. त्यांना त्यांच्या भागाचा विकास हवा आहे, असंही अजित पवार म्हणाले. दरम्यान, पोलीस आज देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जाऊन त्यांनी केलेल्या आरोपांची माहिती घेणार आहेत. त्यामुळे त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
