पुण्यात दोन दिवसांत पारा गाठणार चाळीशी, कोकण किनारपट्टीलाही इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च । येत्या आठवड्यात होळीच्या सुमारास पुण्यातील कमाल तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचेल, असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. १७ ते १९ मार्चच्या दरम्यान कमाल तापमान ४० ते ४१ अंशांपर्यंत राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. पुण्यासह मुंबई, ठाणे, रायगड येथेही तापमानवाढीची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअसच्यादरम्यान आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत यामध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज असून, तापमान ४० अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. राज्यातील नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, त्याचा परिणाम पुणे जिल्ह्यावरही होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पुण्यात सलग दोन दिवस कमाल तापमान ४० अंशांवर जाईल, अशी चिन्हे आहेत. या काळात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेच्या लाटेच्या काळात किमान तापमानातही वाढ होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. १७ ते १९ एप्रिलच्या काळात किमान तापमानातही वाढ होऊन ते २० किंवा २१ अंश सेल्सिअस पर्यंत स्थिरावेल, असे वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याचा विचार केला, तर यापूर्वी २०१७ आणि २०१९ या दोन वर्षांमध्ये कमाल तापमानाने ४० अंशांचा पारा गाठला होता. दोन्ही वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस कमाल तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचले होते. सतरा मार्च रोजीचा अंदाज खरा ठरला, तर नेहमीच्या तुलनेत १५ दिवस आधीच पुण्यातील तापमान चाळीशी गाठेल. पुण्यात आणि कोकण पट्ट्यातही तापमानाचा पारा वाढलेला राहील, अशी शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *