महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १६ मार्च । राज्यातील अनेक शहरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वाढणारे तापमान सोमवारी अधिकच असह्य झाले होते. आठवडाभरात कमाल तापमानात तब्बल आठ अंश सेल्सियसने वाढ झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर, विदर्भात १८ मार्चपर्यंत तापमान प्रचंड वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
राजस्थान आणि गुजरातमध्ये हवामान खात्याने उष्ण लहरीचा अंदाज व्यक्त केला आहे. १८ मार्चपर्यंत तापमान प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम म्हणून विदर्भ, महाराष्ट्राचे तापमान ४१ ते ४२ डिग्रीपर्यंत चार ते पाच दिवस राहणार आहे. ती उष्ण लहर ठरेल. अचानक वाढलेले हे तापमान आरोग्यासाठी धोक्याचं आहे, असे प्रा. सुरेश चोपणे म्हणाले आहेत.
मार्च महिन्याचा हा दुसरा आठवडा आहे. विदर्भातील तापमान अचानक वाढलं आहे. विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रातही तापमान वाढ चालू झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण तापमान ३७ ते ३८ डिग्रीपर्यंत पोहचले आहे. तापमानात पुढील काही दिवसात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविले आहे.