होळी व्यापाऱ्यांना दिलासादायक ; कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने कोटींची उलाढाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १९ मार्च । मागील दोन वर्षात कोरोनामुळे मोठं नुकसान सहन केलेल्या व्यापाऱ्यांसाठी यंदाची होळी चांगली राहिली. होळीनिमित्ताने देशात सुमारे २० हजार कोटींचा व्यवसाय झाला असल्याची माहिती कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने माहिती दिली आहे.

देशभरातील अनेक राज्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा होळीचा सण आणि धूळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. होळीच्या निमित्ताने ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदीदेखील केली. मागील २ वर्षातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे ऐन मार्च-एप्रिलमध्ये कोरोना रुग्णवाढीचा व्यावसायिकांना फटका बसत होता. मात्र यावर्षी व्यवसायात वाढ झाली.

एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नाच्या तारखा असल्यानं व्यवसाय चांगला होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला. विवाह सोहळ्याच्या मोसमातही चांगली खरेदी होण्याचा अंदाज कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने व्यक्त केला आहे.

कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या माहितीनुसार, मागील वर्षी अनेक ठिकाणी असलेल्या कोरोना निर्बंधामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले होते. हजारो कोटींचा माल विक्री अभावी गोदामात, दुकानात पडला होता.

होळी आणि धूळवडीत विशेषत: रंग, अबीर, गुलाल, फुगे, प्लास्टिकची खेळणी, मिठाई, इतर अनेक प्रकारची फुले, फळे, टी-शर्ट, होळीच्या साड्या, इतर खाद्यपदार्थ, अगरबत्ती आणि इत्यादी पुजेच्या वस्तू, यांचा मोठ्या प्रमाणात व्यापार होतो. यंदाच्या होळीत चिनी बनावटीच्या मालाला मागणी नसल्याचेही कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *