महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ मार्च । श्रीलंकेत (SriLanka) आर्थिक संकटामुळे प्रचंड गोंधळ उडाला आहे. देशात अन्नधान्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, त्यामुळे लोकांना तासनतास रांगेत उभे राहून अन्नाची वाट पाहावी लागत आहे. आर्थिक संकट आणि अन्नधान्याचे दर इतके वाढले आहे की, त्याचा परिणाम आता भारतावरही होऊ लागला आहे. श्रीलंकेतील अनेक तमिळ आता भारताकडे (India) वळू लागले आहेत. मंगळवारी जवळपास 16 श्रीलंकेचे लोक भारतात दाखल झाले. श्रीलंकेतील निर्वासित मोठ्या संख्येने भारतात आश्रय घेणार असल्याचा अंदाज आहे.
मंगळवारी श्रीलंकेतील निर्वासितांचे दोन गट भारतीय किनारपट्टीवर दाखल झाले. त्यापैकी सहा जणांच्या एका पथकाची भारतीय तटरक्षक दलाने रामेश्वरमच्या किनाऱ्याजवळ सुटका केली. हे अरिकल मुनाईच्या चौथ्या बेटावर, दूर अडकले होते. हे सर्व जण श्रीलंकेच्या उत्तर जाफना किंवा मन्नार भागातून येत आहेत. मंगळवारी आलेल्या पथकात तीन मुलेही सहभागी झाली होती. हे लोक रामेश्वरच्या तीराजवळच्या एका बेटावर अडकले होते. यानंतर भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी त्यांना तिथून बाहेर काढले. 10 जणांची दुसरी टीम काल रात्री उशिरा भारतीय किनारपट्टीवर पोहोचली.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, तामिळनाडू पोलिसांनी सांगितले की, श्रीलंकेतील प्रचंड बेरोजगारी आणि अन्नधान्याच्या भीषण संकटामुळे श्रीलंकेचे निर्वासित भारताकडे येऊ लागले आहेत. श्रीलंकेचा उत्तर भाग हा तमिळ बहुल प्रदेश आहे. तामिळनाडू इंटेलिजन्सच्या मते, ही केवळ सुरुवात आहे. सध्या तिथून अनेक जण येण्याची शक्यता आहे. इंटेलीजेंसच्या दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेचे सुमारे दोन हजार निर्वासित लवकरच भारतात जाणार आहेत.