महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ मार्च । राज्यातील एसटी कर्मचारी संघटना अद्याप संपावर ठाम असून विलीनीकरणाची मागणी जोर धरत आहे. मात्र, दोन्ही सभागृहात एसटी कर्मचा-यांच्या संपाबाबत निवेदन करताना, एसटी कर्मचा-यांनी 31 मार्च पर्यंत कर्तव्यावर रुजू होण्यासंदर्भात राज्य सरकारने पुन्हा एकदा आवाहन केलं. कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर कर्मचा-यांवरील कारवाया मागे घेण्याचंही स्पष्ट केलं आहे. अजित पवारांनी यासंदर्भात अल्टिमेटम दिला. यानंतर एसटी महामंडळाने परिपत्रक काढलंय.
त्यामध्ये संप काळामध्ये 31 मार्च पर्यंत कर्तव्यावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ रुजू करुन घेण्यात यावे. तर विभाग, घटक , आगारातील संप कालावधीमध्ये ज्या कर्मचा-यांवर शिस्त व आवेदन कार्यपद्धती अंतर्गत निलंबनाची कारवाई झालेल्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे.
तर शिस्त व आवेदन कार्यपध्दती अंतर्गत सेवेतून बडतर्फ करण्याची नोटीस दिलेले कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाल्यास त्यांच्यावरील नोटीस मागे घेण्यात यावी. शिवाय संपकालावधीत करण्यात आलेल्या बदल्या रद्द करून त्यांना पूर्ववत बदलीपूर्वीच्या ठिकाणी हजर करुन घेण्याचे आदेशही या परिपत्रकात दिले आहे.
सेवा समाप्ती झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनाही दिलासा देण्यात आला असून, सेवासमाप्त करण्यात आलेले कर्मचारी 31 मार्चपर्यंत हजर झाल्यास त्यांची सेवासमाप्ती रद्द करून 1 एप्रिल पासून पुर्ननियुक्ती देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, संपातील एसटी कर्मचाऱ्यांना एसटीच्या परिपत्रकामुळे दिलासा मिळाला असून, संपावरील एसटी कर्मचारी कर्तव्यावर हजर होत असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.