महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ मार्च । राज्यात उष्णतेची लाट आता सर्व जिल्ह्यांमध्ये धडकली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये या उष्णतेच्या लाटेचा कहर पहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उष्णतेचा कहर पहायला मिळत आहे. मागील काही दिवस याठिकाणी 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उष्ण जिल्हा ठरला आहे.
बुधवारी चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान 44.2 अंश सेल्सिअस इतके होते. जे हिंदुस्थानातील सर्वात जास्त तापमान होते. 1901 साला नंतर मार्च महिन्यात पहिल्यांदाच चंद्रपूरमध्ये इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. चंद्रपूर मध्ये 2010 साली 43.9 इतक्या सर्वोच्च तापमानाची नोंद करण्यात आली होती.
बुधवारी राज्यात 14 ठिकाणी 40 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली होती. राज्यात चंद्रपूर नंतर अकोला जिल्ह्यात 43.2 एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात 2 एप्रिल पर्यंत उष्णतेची लाट येणार आहे.