महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; दीडशेच्या ‘विदेशी’ बाटलीसाठी साडेचारशे, पाचशे रुपये गेले तरी बेहत्तर, पण ढोसायचीच…! ‘संचारबंदी’तही दारू तस्करांनी गल्लोगल्ली बाजार मांडलाय. काही दिवसांपासून धंदा फुल्ल फार्मात चाललाय! ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने सर्वत्र ‘जैसे थे’ची स्थिती आहे. संचारबंदीमुळे नागरिकांना रस्त्यावर येण्यास मज्जाव करण्यात आल्याने पहिल्या दोन-चार दिवसांत आदेशाचे काटेकोर पालन झाले. दैनंदिनी गरजेच्या वस्तू मिळणेही महाकठीण बनले.
लॉकडाऊन…? मग, दारूसाठा आला कोठून?
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने केलेले प्रयत्न कौतुकास्पद . लॉकडाऊनमुळे औषधे दुकाने वगळता सर्वच व्यवहार ठप्प आहेत. हॉटेल्स, बार, परमिट रूम, वाईन शॉपी एव्हाना गावठी दारूची अड्डेही शंभर टक्के बंद असताना दारू तस्करांकडे देशी, विदेशी दारूचा जिल्ह्याला पुरेल एवढा दारूसाठा आला कोठून, हा सामान्यांचा सवाल आहे.लॉक डाउन रविवारी अकरावा दिवस होता. स्थानिक पंटरमार्फत छुप्या मार्गाने वितरण यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. 150 ची बाटली 450 ते 500 रुपयाला, अडीचशेची 750 ते 800 रुपये, पाचशे ते सहाशेची 1500 पासून 2000 रुपयांपर्यंत त्यांचा भाव वधारला आहे. पैसे कितीही गेले, तरी बेहत्तर; पण सायंकाळला ढोसायचीच…