महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.९ एप्रिल । भाजपचा गुणरत्न सदावर्तेंना पाठिंबा असून हा विरोधी पक्षाच्या दळभद्रीपणाचा कळस आहे. सदावर्तेंना शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गरळ ओकण्यासाठी फंडिंग केले जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. काल झालेला हल्ला हा त्यातीलच एक भाग होता. जे आंदोलक आता रेल्वे स्टेशनवर बसले आहेत, त्यांच्याकडे सर्वांकडे एकाच वेळी प्लॅटफॉर्म तिकीट कसे काय? ही कोणती यंत्रणा आहे. त्यांना कोणता राजकीय पक्ष पोसत आहे. कामगारांच्या मागण्याबाबत आमची संवेदना आहेच, पण एक गट भरकटवून विरोधक सरकारविरुद्ध हल्ले करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. पवारांनी ज्या लोकांना मोठे केले, तेच पवार यांच्याविरोधात बोलत होते. बाडगे मोठ्याने बाग देतात, तो प्रकार आम्ही काल पाहिला, असे राऊत म्हणाले. गुळगुळीत सत्ताकारण आज चालत नसल्याचेही ते म्हणाले. शरद पवारांच्या घरावर हल्ला करणारे एसटी कर्मचारी नाहीत, तर हल्ल्यामागे अतृप्त आत्म्यांचा हात आहे, अशी खोचक टीका संजय यांनी केली आहे.
संजय राऊतांनी शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ल्यासंदर्भात म्हटले की, शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ल्याला मी आंदोलन म्हणत नाही. यामागे काही राजकीय पुढाऱ्यांचा हात असू शकतो. महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचे आहे, असे काही असे अस्वस्थ आणि अतृप्त आत्मे महाराष्ट्रात आहेत व त्यांच्या माध्यमातून हे सर्व सुरू आहेत.
त्यांनी म्हटले की, या लोकांना सतीश उके यांना अटक केल्यानंतर आनंद होतो. मुंबईतील एक वकील सदावर्ते यांना पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्रास होतो. दोघेही वकील, दोघांनाही समान न्याय पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यातील लोक गेले काही दिवस कोणी विधान परिषदेत आहेत, कोणी रस्त्यावर आहेत. महाविकास आघाडीतील माननीय पवार साहेबांवर ते टीका करतात आणि आम्हाला भाषा विचारतात. तर आमची भाषा अशीच असेल असा टोला राऊतांनी लगावला आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की, ज्या प्रमाणे तुम्ही शरद पवार यांच्यावर टीका टिप्पणी करत आहात. अशा प्रकारची भाषा वापरतात. म्हणजे तुमच्या संघाच्या शाखेमध्ये याच भाषेचे वर्ग घेतात का? साधनशुचिता असे शब्द वापरतात. ते कुठे गेले? असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. ही घाण महाराष्ट्राला साफ करावी लागेल आणि आता ती वेळ आली आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर नाही, तर विरोधी पक्षातील काही लोकांचा स्तर खाली गेला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.