महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ मे । गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा फारच तापला. बहुतांश शहरात ४० च्या वर तर काही भागात ४५ ते ४६ अंशांपर्यंत तापमान गेले. पण उन्हासोबत वाऱ्याचा वेग अपेक्षित वाढलेला नसल्याने १० मेपर्यंत राज्यात उष्माघाताने बळीची एकही अधिकृत नोंद नव्हती. मात्र त्यानंतर ११ ते २१ मेदरम्यान मात्र राज्यात सहा उष्माघाताने मृत्यूची नोंद झाली. तज्ज्ञांच्या मते, उन्हासोबत वाऱ्याचा वेग वाढल्यावर उष्माघाताचे रुग्ण वाढतात. त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढल्यावर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरचे पुढील १० ते १५ दिवस अधिक महत्त्वाचे आहेत. शनिवारी (२०मे) वाऱ्याचा वेग ताशी २९ किलोमीटर प्रति तास होता. आगामी ८ दिवस वाऱ्याचा वेग असाच राहील. यामुळे उष्माघात होण्याचा धोका अधिक असतो. वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास उष्माघात टाळणे शक्य आहे.
राज्यातील अशी आहे स्थिती
१० मे २०२२ पर्यंत राज्यात २५ उष्माघात संशयितांचा मृत्यू झाला होता. त्यात जळगाव ४, नागपूर ११, जालना २, अकोला ३, अमरावती, औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद, परभणीमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद आहे. या २५ पैकी ६ मृत्यू हे उष्माघाताचे बळी असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. जालना, उस्मानाबाद, अकोला, जळगावचे प्रत्येकी १ तर नागपूरच्या २ जणांचा त्यात समावेश आहे.