महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जून । ऐन शाळा सुरू होण्याच्या तोंडावर मुंबई, ठाणे, पुणे सारख्या शहरांत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. दररोज वाढणारी रूग्णसंख्या ही चिंतेचा विषय असला तरी पूर्ण काळजी घेऊन शाळा 13 जूनपासूनच सुरू होतील, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेला शिक्षण विभागाचे प्राधान्य आहे. त्यामुळे शाळांकरीता नवी कोरोना नियमावली जारी करण्यात येणार आहे. राज्याचा आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांच्याशी चर्चा करून शाळा सुरू होण्यापूर्वी कोरोना प्रतिबंधक नियमावली शाळांनी दिली जाईल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले. याआधीच्या वर्षात कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले आहे. यंदा जे विद्यार्थी दुसरीत गेली आहेत. त्यांनी शाळा अनुभवलीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणार्या शैक्षणिक नुकसानाचा विचार करून शाळा पुरेशी खबरदारी घेऊन सुरू करण्यावर भर राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सक्ती नाही, पण स्वतःच्या सुरक्षेसाठी मास्क वापरा
राज्यात सध्या तरी मास्क सक्ती करण्यात आलेली नाही, मात्र स्वतःच्या सुरक्षेसाठी मास्क वापरावा, त्याचा फायदा अनेक जणांना होऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी शाळेत मास्क वापरणे बंधनकारक नाही. मात्र पुढील काही दिवसांमधील परिस्थिती पाहून याविषयीही सूचना देण्यात येतील असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.