जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल…; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ जून । शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कालपासून पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. यासर्व घडामोडींवर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे. शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल, सत्ता पुन्हा मिळवता येते, पण पक्षाचीही प्रतिष्ठा असते, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्याशी आज सकाळीच फोनवरुन तासभर चर्चा झाली. झालेल्या चर्चेती माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देण्यात आल्याचंही संजय राऊत म्हणाले. एकनाथ शिंदेंना पक्ष सोडणं सोपं नाही आणि आम्हालाही त्यांना सोडणं सोप नाही, असंही ते म्हणाले. नाराजी दूर होईल, सर्व आमदार परत येतील. एकनाथ शिंदेंचं बंड शांत होईल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. तसेच, आसाममध्ये सर्व आमदार सध्या पर्यटनासाठी गेले आहेत. आमदारांनी फिरायला हवं, नाराज कोणीच नाही. एकनाथ शिंदेंसोबत सतत संपर्कात आहोत. शिवसेनेचे नेतेही त्यांच्याशी संपर्क साधत आहेत, असंही राऊतांनी सांगितलं.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “राज्यपालांना करोना झाला असल्याने काम थोडं धीम्या गतीने सुरु आहे. राज्यपालांना थोडं बरं वाटू द्या त्यानंतर कोणाकडे किती आमदार आहेत पाहूयात. उगाच जास्त उतावीळपणा नको. एकनाथ शिंदे आणि आमचे सर्व लोक पुन्हा स्वगृही परततील याची आम्हाला खात्री आहे.” आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होणार असल्याचंही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं. पुढे बोलताना “शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे. जास्तीत जास्त सत्ता जाईल. सत्ता पुन्हा मिळू शकते, पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वरती आहे.” असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

“एकनाथ शिंदे आणि आमदारांची नाराजी हा आमच्या घरातील विषय आहे. सर्व लोक पुन्हा आपल्या घरी येतील. एकनाथ शिंदे आणि इतर सहकाऱ्यांशी व्यवस्थित संवाद सुरु आहे.” राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आमदार नाराज असल्यासंबंधी विचारल्यावर राऊत म्हणाले की, “मला याबद्दल माहिती नाही. त्यांच्यासोबत आपण सरकारमध्ये आहोत. असं कोणत्याही आमदारानं म्हटलं असेल असं मला वाटत नाही.” असं राऊत म्हणाले.

“आज सकाळीच माझं एकनाथ शिंदेंसोबत बोलणं झालं आहे. त्यांच्याशी पक्षाचा संवाद सुरु आहे. ते शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरेंपासून ते आतापर्यंत त्यांनी शिवसेनेत काम केलं आहे. त्यांच्याशिवाय आमच्या मनात कायम आदर आहे. चर्चा, संवाद सुरुच असतात. एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या चर्चेबद्दल मी उद्धव ठाकरेंनाही कल्पना दिली आहे. शिवसेनेत काही होतंय असं वाटत असेल तर तसं नाही. बाहेर असणारे सर्वजण शिवसैनिक असून त्यांना शिवसेनेसोबतच राहायचं आहे. काही गैरसमजातून या गोष्टी घडल्या असतील तर त्या दूर केल्या जातील.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *