महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ जून । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात आलं आहे. अशात बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केलं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी वर्षा बंगला सोडला आणि ते मातोश्रीवर दाखल झाले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र नाराजीचे सूर असल्याचं समोर येत आहे.
उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडायला नको होता, अशा नाराजीचा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतून उमटल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या 37 पेक्षा जास्त आमदार असल्याचं समोर येत आहे. यामुळे ठाकरे सरकार संकटात आलं आहे.
बुधवारी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या फेसबुक लाइव्हनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार त्यांना भेटायला वर्षा बंगल्यावर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्यासह काही मंडळी होती. मात्र, यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या अन्य एका बैठकीत उद्धव ठाकरेंच्या वर्षा बंगला सोडण्याच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे.