महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ जून । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. यासगळ्यावर सोशल मीडियावर सर्वसाधारण व्यक्ती नाही तर सेलिब्रिटींपर्यंत सगळेच प्रतिक्रिया देत आहेत. तर आता अभिनेता सुमीत राघवननं एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एक ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे.
सुमीतने एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुमीत म्हणाला, “साहेब, तुमच्या यादीत ‘महाराष्ट्र हित’ चौथ्या क्रमांकावर आहे आणि माझा मुद्दा हाच आहे. शिवसैनिक भरडले जात आहेत, त्यांचे खच्चीकरण होत आहे. अनैसर्गिक आघाडी वगैरे हे सगळं बरोबर आहे, पण जो सामान्य माणूस आहे तो सदैव मागेच राहणार. तो जो ‘आता’ आहे ना त्या वाक्यातला तो वेदना देणारा आहे.”
काय म्हणाले होते एकनाथ शिंदे
गेल्या अडीच वर्षात घडलेल्या चार मुद्द्यांच्या आधारे एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, “गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा केवळ घटक पक्षांना झाला. यामध्ये शिवसैनिक भरडला गेला. एकीकडे घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत गेलं. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचं आहे.