महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ जून । दोन वर्षानंतर वारकरी सांप्रदायाचा सोहळा थाटामाटात पंढरीकडे निघाला आहे. हवेली तालुक्यातून वैष्णव भक्तांमध्ये मोठी गर्दी होते. त्यांची गैरसोय होणार याची दखल घेतली आहे. पालखी विसाव्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाणी, तसेच आरोग्याची सुविधा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून दिली आहे. वारकऱ्यांची कोणतीही अडचण होणार नाही, याची दक्षता घेतली आहे, असे काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
दरम्यान, वडकीचे सरपंच अरुण गायकवाड म्हणाले की, पालखी विसाव्याच्या ठिकाणी दीड-दोन तास थांबते. यावेळी भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी दर्शनबारीची व्यवस्था केली आहे. विसाव्यानंतर दिवे घाटात माऊलींच्या रथाला मानाच्या पाच बैलजोड्या आणि इतरही शेतकरी बैलजोड्या घेऊन येतात, त्यांनाही सहभागी करून घेतले जाते, असे त्यांनी सांगितले.