महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ जून । पक्षांतर केल्यामुळे अपात्र ठरणाऱया तसेच राजीनामा देणाऱया आमदारांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घाला, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. महाराष्ट्रातील राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी ही याचिका केली आहे. याचिकेवर 29 जूनला सुनावणी होणार आहे.
जर सभागृहाचा सदस्य दहाव्या अनुसूचीनुसार अपात्र ठरला असेल तर त्याला अपात्र ठरल्याच्या किंवा राजीनामा दिल्याच्या तारखेपासून पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्या जया ठाकूर यांनी केली आहे. ठाकूर यांनी यासंदर्भात जानेवारी 2021 मध्ये रिट याचिका दाखल केली आहे. त्यांच्या नव्या याचिकेवर न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.