महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ जुलै । कोकणात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली आहे. याचा मोठा परिणाम मुंबई-गोवा महामार्गावर झाला आहे. याच मार्गावर चिपळूण रत्नागिरी दरम्यान असलेल्या कामथे येथे रस्त्यावर मोठी भेग पडल्याने खळबळ उडाली आहे. या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे.
खेड चिपळूण मार्गावरील परशुराम घाटातही दरड कोसळण्याचा धोका असल्याने वाहनचालक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. तब्बल एक महिना कालावधीत हा घाट काहीकाळ वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. तरीही मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात अनेक ठिकाणी अजस्त्र दरडी मार्गावर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र या घाटातील वाहतूक तुर्तास सुरळीत आहे. चिपळूण शहरात गुरुवारी संध्याकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे. चिपळूण नगरपरिषद प्रशासन या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून सतर्क आहे.