पंढरपूर ; दोन वर्षांनंतर भाविकांना मिळाला प्रसाद ; विठुरायाच्या लाडू प्रसादाची विक्री सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ जुलै । कोरोनामुळे (Corona) दोन वर्षांपासून बंद असलेला विठुरायाच्या लाडू प्रसादाची आता विक्री सुरू झाली आहे. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते लाडू विक्रीचा प्रारंभ करण्यात आला‌. तब्बल दोन वर्षांनंतर भाविकांना लाडू प्रसादाचा आस्वाद घेता आला.

विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणत भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना विठुरायाचा अल्पदरात प्रसाद उपलब्ध व्हावा यासाठी मंदीर समितीच्या वतीने लाडू प्रसाद विक्री केली जाते. मात्र, कोरोनामुळे मागील दोन‌ वर्षांपासून लाडू प्रसादाची विक्री बंद होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मंदिर सुरु झाले. पण लाडू प्रसादाची विक्री बंद होती. लाडू प्रसादाची विक्री सुरू करावी‌ अशी मागणी भाविकांनी‌ केली होती. त्यानंतर मंदिर समितीने आषाढी यात्रेच्या तोंडावर लाडू विक्री सुरू केली आहे.

नाशिक येथील यशोधरा महिला सहकारी औद्योगिक सहकारी संस्थेला लाडू प्रसाद तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. आषाढीसाठी सुमारे आठ लाख बुंदी लाडू तर तीन लाख राजगिरा लाडू तयार करण्यात येणार आहेत. लाडू प्रसाद तयार करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.140 ग्रॅम वजनाचा बुंदी लाडू प्रसाद 20 रुपये तर 50 ग्रॅम वजनाचा राजगिरा लाडू प्रसाद 10 रूपयांना मिळणार आहे. दोन वर्षांनंतर भाविकांना‌ लाडू प्रसाद मिळू लागल्याने आता समाधान व्यक्त केले जात आहे. ‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *