महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ जुलै । इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने १०० धावांपर्यंत ५ विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर ऋषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या समाचार घेतला. त्याने रविंद्र जडेजा सोबत इंग्लंडचा अहंकार मोडला. या दोघांची फलंदाजी पाहून शांत आणि संयमी असणारे भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना इतका जोश आला की ते बाल्कनीत येऊन चीयर करू लागले.
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करण्यास उतरलेल्या भारतीय संघाने ९८ धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर पंत आणि जडेजा यांनी डाव सावरला. या दोघांनी आक्रमक फलंदाज करत २३९ चेंडूत २२२ धावा कुटल्या.
पंत ज्या परिस्थितीत फलंदाजी करण्यास आला होता. ते पाहता अन्य कोणी असता तर थोडी संयमी फलंदाजी केली असती. पण पंतने थेट हल्ला चढवला. पंतचा राग खास करून फिरकीपटू जॅक लीचवर निघाला, त्याच्या एका ओव्हरमध्ये पंतने २२ धावा वसूल केल्या.
पंतने १११ चेंडूत १९ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १४६ धावा केल्या. १५० धावा होतील असे वाटत असताना जो रूटच्या चेंडूवर जॅक क्रॉलीने पंतचा कॅच घेतला. पंतने शतक पूर्ण केल्यावर भारताचे कोच द्रविड यांना सर्वात जास्त आनंद झाला. नेहमी शांत आणि संयमी दिसणारे द्रविड यांनी मात्र उत्साहात बाल्कनीत आले आणि त्यांनी पंतचे अभिनंदन केले. द्रविडने एका जाहिरातीत इंद्रानगरचा गुंड अशी व्यक्तीरेखा साकारली होती. काल बाल्कनीतील द्रविडचा जल्लोष पाहून चाहत्यांना त्या जाहिरातीची आठवण आली.