महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ जुलै । एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता काँग्रेसची धास्ती वाढलेली दिसून येत आहे. शिवसेनेनंतर काँग्रेसमध्ये फोडाफोडीची भीती काँग्रेसला वाटत आहे. एकही मत फुटू न देण्यासाठी काँग्रेस नेते कामाला लागले आहेत. राज्यातल्या नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत. आमदारांना हॉटेलात एकत्र ठेवा अन् तीनचार जणांच्या गटाची जबाबदारी एकेका नेत्यावर सोपवा, असा प्रस्ताव समोर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना यासंदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणही मदत करणार आहेत.
उद्या रविवारी 3 आणि सोमवार 4 जुलैला विशेष अधिवेशन होणार आहे. शिंदे सरकारला बहुमत चाचणी पास करावी लागणार आहे. पण त्याआधी विधानसभा अध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत मते फुटू नयेत म्हणून काँग्रेसकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
दरम्यान, रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर दाखल झाले आणि त्यांनी कायदेशीर बाबींबाबत चर्चा केली. बहुमत चाचणीबाबत दोन्ही नेत्यांनी पुढील रणनीती ठरवली.