महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । पक्षांतर्गत कलहामुळे शिवसेना आतून पोकळी झाली आहे. शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन करुन सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, पक्षाचे आजी-माजी खासदारही शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यातच, पक्षाने अडीच वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. पक्षाने माजी खासदार शिवाजीराव आढाळराव-पाटील यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आवाहन केले आहे.
‘पक्षाने केली विनंती, पण…’
इंडियन एक्स्प्रेसशी बातचीतमध्ये आढाळराव पाटील म्हणाले की, ”काल मी आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत आणि विनायक राऊत यांची भेट घेतली. या बैठकीत संजय राऊत यांनी मला पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करण्यास सांगितले. पण, मी त्यांना शिरुरमधूनच उमेदवारी देण्याची विनंती केली. पण, पक्षाने आदेश दिल्यावर विचार करेन,” असे सूचक विधानही त्यांनी केले.
संजय राऊत म्हणतात…
दरम्यान, संजय राऊत म्हणाले की, “आम्ही आधळरावांना पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह केला होता हे खरे आहे. गेल्या काही महिन्यांपासून पक्षाने त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा आग्रह केला होता, मात्र त्यांनी अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यांची लोकप्रियता पाहता, आम्हाला खात्री आहे की ते ही जागा जिंकतील.”
राष्ट्रवादीचा शिरुरवर दावा
शिरूर मतदारसंघातून आधळराव तीनदा निवडून आले आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी पराभव केला होता. आधळराव यांना शिरूरमधून पुन्हा निवडणूक लढवायची आहे, मात्र राष्ट्रवादी ही जागा सोडण्यास तयार नाही. राष्ट्रवादीला विजयी जागा सोडायला आवडणार नाही, असेही राऊत म्हणाले.