महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । राज्यात मागील जवळपास दोन आठवड्यांपासून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आणि अपक्ष मिळून ५० आमदारांनी बंड केल्याने राज्यातील महविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. शिंदे गट आणि भाजपने बहुमत सिद्ध करून राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र, राज्यातील या सत्तातरानंतर उद्धव ठाकरे यांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाण्यात शिवसेनेला आता मोठं खिंडार पडलेलं आहे.
नगरसेवकांमधील शिवसेनेतील मोठा गट शिंदे गटात जाणार असल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातले शिवसेनेचे ६६ नगरसेवक शिंदे गटात (Eknath Shinde Faction) सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे ठाणे महानगरपालिकेतील अर्धे नगरसेवक शिंदे गटात सहभागी होत आहेत.
66 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. माजी महापौर नरेश मस्केंसमवेत ६६ नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी आपलं समर्थन शिंदे गटाला दिलं. शिवसेनेचा एकही नगरसेवक आता ठाणे महानगरपालिकेत राहिलेला दिसत नाही.
ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचा शब्द सर्वस्व मानला जातो. मुंबईप्रमाणेच ठाणे महानगरपालिकाही शिवसेनेसाठी तितकीच महत्त्वाची आहे. अशात शिवसेनेचे 66 नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाल्याने शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे.