महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजपाने एकत्र येत सत्ता स्थापन केल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील सरकारच्या काळातील निर्णयांचा आढावा घेण्यास सुरुवात केलीय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील महाविकास आघाडीच्या निर्णयांमध्ये शिंदे सरकार बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र आता या विषयावरुन मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी शिंदे सरकारला आव्हान दिलंय.
भाजपाच्या नेत्यांनी फडणवीस सरकारच्या काळात स्थानिक स्वराज्यसंस्थांमधील निवडणुकींसंदर्भात घेण्यात आलेले निर्णय लागू करण्याची मागणी केलीय. यामध्ये प्रामुख्याने संरपंच आणि नगराध्यक्षांची निवड पुन्हा थेट जनतेमधून करण्याची तसेच महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेत बदल करण्याचे संकेत दिले जात आहेत. यावरुन पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरेंनी शिंदे सरकारला आव्हान दिलंय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनापासून पुन्हा चर्चेत आलेल्या वसंत मोरेंनी ट्विटरवरुन थेट शिंदे सरकारला आव्हान दिलंय. “सरकार बदलले, असं ऐकतोय. प्रभाग रचनाही बदलणार आहात म्हणे. सरपंच आणि नगराध्यक्ष नागरिकांमधून निवडून देणार,” असं म्हणत मोरे यांनी एक ट्विट केलंय. पुढे ते म्हणतात, “माझे सरकारला एक आव्हान आहे. हिंमत असेल तर मग महापौर सुद्धा जनतेतून निवडा. आजच सांगतो, किती पण ताकद लावा, पुण्याचा महापौर मनसेचाच असेल.”
मोरेंनी केलेली मागणी मान्य करणं सध्याच्या नियमांनुसार सरकारला शक्य नसलं तरी यावर भाजपा आणि शिंदे समर्थक गटाकडून काय प्रतिक्रिया येतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिंदे गटाच्या बाजूने मतदान केलं होतं. मात्र आता मोरेंनी थेट सरकारविरोधी भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.