महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । राज्याच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षीत विस्तार आषाढी एकादशीनंतरच होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) स्पष्ट केलं आहे. दिल्लीत भाजपच्या (Shinde) केंद्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली .
भाजप सेना युतीचं जे सरकार अडीच वर्षांपूर्वी स्थापन व्हायला हवं ते आता आम्ही केलं आहे. आमची जबाबदारी वाढली आहे. 5 वर्ष ज्यांनी खूप चांगलं काम केलं. शेतकरी आणि लोकहिताचं काम केलं ते मधल्या काळात खंडीत झालं. ते आम्ही पुन्हा पुढे नेणार आहोत असंही मुख्यमंत्री म्हणाले.
संजय राऊत करत असलेल्या आरोपांत कोणतीही तथ्ये नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे तीन ते चार वेळा जाऊन आलो. भाजपशी हातमिळवणी करण्याची विनंतीही केली. भाजप नैसर्गिक मित्र असल्याचे सांगितले. परंतु उद्धव यांचे मन आम्ही वळवू शकलो नाही.