महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार घटनाबाह्य ठरवण्यासह अन्य बाबींना आव्हान देणाऱ्या चार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. उद्या ११ जुलै रोजी यावर सुनावणी होणार आहे. याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. शिंदे गटाने अन्य पक्षात विलीनीकरण न केल्याने तेच मूळ पक्ष होऊ शकतात का? नसल्यास ते अपात्र ठरणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर उद्याच्या सुनावणीवर अवलंबून आहेत.
उद्या सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. या चर्चेला सुभाष देसाई, अरविंद सावंत आणि संजय राऊत हे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयीन लढाईत शिवसेना कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
माध्यमांशी बोलतना राऊत यांनी म्हटलं की, “कायदेशीर लढाईत शिवसेना कुठेही कमी पडणार नाही. आम्हाला माहीत आहे, कुणावर कसे दबाव सुरू आहेत. कायद्याची कशी पायमल्ली सुरू आहे. देशात लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न मिनिटा-मिनिटाला होतोय. पण उद्या अकरा तारीख आहे. सर्वोच्च न्यायालयामधील महत्त्वाच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष लागलं आहे. देशात लोकशाही आणि न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की नाही, हे उद्याच्या निकालावरून कळेल,” असंही राऊत म्हणाले.