महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे पक्षातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अधिक सक्रीय झाले आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. यातच आता सर्वप्रथम आम्ही शिंदे गट नाही. शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा हा गट आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले.
हिंगोलीचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मुंबईत मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. एकनाथ शिंदे यांनीही बांगर यांचा सत्कार करत, त्यांची पाठराखण केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संतोष बांगर यांनी शक्तिप्रदर्शन केले नाही. हे त्यांचे प्रेम आहे. बांगर आपले पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मला भेटायला आले होते. त्यांच्या ठिकाणच्या अडचणी, समस्या, प्रश्न सोडवण्याचा शासन नक्कीच प्रयत्न करेल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.